आला उन्हाळा ,तब्येत सांभाळा
आता थंडी संपून नुकताच उन्हाळा प्रारंभ झाला आहे ,भारतात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होतो (वसंत व ग्रीष्म ऋतू)परंतु सकाळी थंडी ,दुपारी कडक ऊन असंच चित्र पहायला मिळतं आणि या अशा वातावरणात तब्येतीच्या तक्रारीसुद्धा हळूहळू जोर धरू लागतात म्हणून योग्य आहार -विहाराने शरीरातील वात, पित्त ,कफ साम्य स्थितीत ठेवल्यास उन्हाळा सुकर होईल.
💠आहार
नुकतीच थंडी संपली .
थंडीमध्ये जो कफाचा संचय झालेला असतो, तो कफ सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पातळ होतो ,त्यामुळे जाठराग्नी(भूक)मंदावलेली असते. अशावेळेस सहज पचेल असा हलका आहार घ्यावा.
थोडक्यात उन्हाळा हा 'डायेटिंग' चा ऋतू आहे असं म्हणायला हरकत नाही.
सध्या वसंत ऋतूची सुरुवात आहे.
ऋतूराज 'वसंत' जरी नवचैतन्य निर्माण करणारा असला तरी असलेल्या मंदाग्नीमुळे हलका फुलका आहार घ्यावा .
सकाळच्या नाष्ट्याला जड पदार्थाऐवजी विविध फळांचे रस घेणे चांगले.
दुपारी हलका पौष्टिक आहार घ्यावा.
पोळी, डाळ,कमी तेलाच्या भाज्या ,कांदा, टोमॅटो, काकडी खावे, भरपूर कोशिंबीर घ्यावी.
शीतपेय,आईस्क्रीम चा मोह टाळावा .
त्याऐवजी लिंबू सरबत घ्यावे ,चहा कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावे .
बटाटा, राजमा, साबूदाणे, मांसाहाराला सुट्टी द्यावी.
ग्रीष्म ऋतूमध्ये कफ कमी होऊन वात वाढतो. यावेळी गोड, शीतल,पाचक,रसयुक्त फळे(कलिंगड, मोसंबी, आंबा,द्राक्षे )खावेत. माठातील पाणी, दही, ताक,सेवन करावे. जास्त खारट, कडू पदार्थ टाळावेत .कैरीचे पन्हे ,थंड दूध ,नारळपाणी ,पालक सूप घ्यावे.
💠विहार:
अतिउन्हात जाणे टाळावे.
सकाळी मोकळ्या हवेत फिरावे.
बाहेर जाण्याअगोदर थंड पाणी प्यावे,शक्यतो बाहेरचे पाणी पिऊ नये ,उन्हातून फिरताना छत्री,गॉगल चा वापर करावा.
त्वचा काळवंडू नये म्हणून घरचे ताजे लोणी त्वचेवर चोळावे.
सैलसर पांढरे कपडे वापरावे .
उष्णता वाढू नये म्हणून शीतल द्रव्यांची उटणी लावावीत. (अनंतमूळ,वाळा,चंदन,जेष्ठमध यांचे चूर्ण )
पायांची जळजळ कमी करण्यासाठी सकाळी लॉनवर अनवाणी चालावे .
अतिव्यायाम,उपवास टाळावा .
दिवसा थोडी झोप घ्यावी.
💠व्याधी किंवा आजार
शरीरातील पाणी कमी होते. त्याने थकवा लवकर येतो,त्यामुळे चक्कर ,भोवळ येते ,कफाचे विकार होतात .
हातापायांच्या तळव्याची आग होते.अशावेळी मनुका,धने घातलेले पाणी प्यावे .
डोळ्यांची आग होणे,जळजळणे असे प्रकार झाल्यास गुलाबजलाच्या पट्ट्या किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्यात ,लहान मुलांना घामोळं येतं.
अशावेळी खरबुजाचा गर लावावा ,लघवीला जळजळ असल्यास कपभर दुधात खडीसाखर मिसळून घ्यावे.
अतिसार,काविळीसाठी घरचे शुद्ध पाणी प्यावे. बरेचदा नाकातून रक्त येत असल्यास बर्फ लावावे.
अशाप्रकारे थोडीशी काळजी घेतली तर आपला उन्हाळा सुकर करू शकता.
डॉ.संध्या झाडे
संजीवनी हॉस्पिटल
शेडगेवाडी.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment